TOD Marathi

मुंबई: पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ईडी कोठडीत असलेले खासदार संजय राऊत हे आणखी एका नव्या कारणामुळे चर्चेत आले आहेत. संजय राऊत (Sanjay Raut) हे यापूर्वी बाहेर असताना शिवसेनेची बाजू मांडत होते. प्रसारमाध्यमांसमोर असो की ‘सामना’तून ते व्यक्त व्हायचे. परंतु, संजय राऊत यांना ईडीने (ED) अटक केल्यानंतर हे लेख थांबतील, असा अंदाज होता. मात्र, संजय राऊत ‘ईडी’च्या कोठडीत असूनही ‘सामना’तून त्यांच्या नावाने लेख प्रसिद्ध होत आहेत. आणि याच मुद्द्यावरून आता वाद निर्माण झाला आहे. (Sanjay Raut Written Article in Sammna)
मनसे संदीप देशपांडे यांनी याविषयी आक्षेप नोंदवला होता. (MNS Leader Sandeep Deshpande) संजय राऊत ईडीच्या कोठडीत आहेत. मग ते तिथून ‘सामना’साठी लेख कसे लिहू शकतात? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता. तुरुंगातून लेख लिहायला संजय राऊत हे काही स्वातंत्र्यसेनानी नाहीत, असेही देशपांडे यांनी म्हटले होते. त्यामुळे हा मुद्दा ऐरणीवर आला होता आणि याची दखल घेत आता ईडीच्या अधिकाऱ्यांकडून याविषयी संजय राऊत यांची चौकशी होण्याची शक्यता आहे.

एखादी व्यक्ती तुरुंगात असल्यास त्यांना अशाप्रकारे लेख लिहता येत नाहीत. तसे करायचे झाल्यास न्यायालयाच्या विशेष परवानगीची आवश्यकता असते. आणि जोपर्यंत न्यायालय अशी परवानगी देत नाही, तोपर्यंत असे लेख लिहीण्यास मज्जाव आहे. त्यामुळे आता ‘सामना’तील संजय राऊत यांचे लेखन थांबणार का? हे पाहावे लागेल.